

मुंबई : मुंबईचे महापौरपदही शिवसेनेला हवे असून महायुतीच्या चर्चेतच सव्वा वर्षासाठी शिवसेनेला महापौरपद देण्याचा निर्णय झाल्याचे शिवसेना नेते सांगत आहेत. मात्र येणारी पाच वर्षे आमच्याच पक्षाचा महापौर राहील, असे भाजपाकडून सांगण्यात येत आहे. महापौरपदावरून भाजपा-शिवसेनेत नवा वाद उभा राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीचे 118 नगरसेवक निवडून आले. यामध्ये भाजपाचे 89 नगरसेवक असून शिवसेनेचे 29 नगरसेवक आहेत. त्यामुळे सर्वाधिक नगरसेवक असलेला मोठा पक्ष म्हणून भाजपला महापौरपद देण्यात आले. महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे विराजमान झाल्यानंतर मुंबईत शिवसेनेलाही महापौरपद मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील पदे वाटण्यावरून भाजपा व शिवसेना नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत दोन्ही पक्षांनी समान पदे घ्यावी यावर एकमत झाले होते.
स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीतही शिवसेनेला किमान सव्वा वर्षासाठी महापौर पद मिळावे, यावरही एकमत झाल्याचे शिवसेना नेते सांगत आहेत. मात्र महापौर पदाचे सव्वा वर्ष कोणतेही ठरलेले नाही. शिवसेनेने महापौरपदासाठी केलेल्या दाव्यानंतर भाजपाच्या नेत्यांनी मुंबई महापालिकेवर पाच वर्षे आमचाच महापौर बसणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत महायुतीमध्ये पदांचे समान वाटप
मुंबई महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत ज्या पदांचे वाटप झाले, ते भाजपा व शिवसेनेला समान झाले आहे. सर्वाधिक नगरसेवक असल्यामुळे महापौरपद भाजपाला मिळाले असून स्थायी व शिक्षण समिती भाजपाच्या वाट्याला आली आहे, तर शिवसेनेला उपमहापौरसह सुधार व बेस्ट समिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाशी भाजपाची युती असताना सुधार समिती भाजपाने कधीच सोडली नव्हती. मात्र यावेळी ही समिती शिवसेनेला देण्यात आली.