

मुंबई : सर्वच गृहनिर्माण धोरणात मराठी माणसाविषयी द्वेष आहे. धारावीचा प्रश्न केवळ घरांचा नव्हे, तर तो तेथील रहिवाशांचा उदरनिर्वाणाचा आहे. शहरात सुरू असलेला घराचा पुनर्विकास म्हणजे मुंबईकरांना मुंबई बाहेर घालवण्याचे कारस्थान आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ वास्तुविशारद चंद्रशेखर प्रभू यांनी येथे केले. मराठी माणसाला मुंबईत राहायचे असेल तर रस्तावर येऊन लढावे लागेल, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
मराठी अभ्यास केंद्रा तर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त दादर शिवाजी मंदिर शाहू सभागृहात मराठी गृहनिर्माण धोरण परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रशेखर प्रभू बोलत होते.
पुढे ते असेही म्हणाले, मुंबई शहराला वेगळे करण्याचे कारस्थान जुने आहे. त्यामुळेच ठाणे, वसई, पनवेल एकत्र करून महामुंबई नावाने खरी मुंबई वेगळे करण्याची स्वप्न काही लोक पाहत आहेत. जी घरे कोणाला नको आहेत, ती शालू आणि वांगणी येथील घरे गिरणी कामगारांच्या माथी मारली जात आहेत. त्यासाठी बिल्डरांना वाढीव एफएसआय देण्यात आला. त्यामुळे आताचे नवे गृहनिर्माण धोरण फेकून द्या, हे सांगण्याची हिंमत ठेवा असेही प्रभू यावेळी म्हणाले.
यावेळी गिरणी कामगार संघटनेचे हेमंत राऊळ, मुलुंड पूर्वरंग सोसायटीचे सचिव मिलिंद महाडिक, नागरी निवारा परिषद सोसायटीचे सचिव विनायक जोशी, बस्तान संस्थेचे मुख्य समन्वयक महेंद्र शिरवळे, आदी मान्यवरांची भाषणे झाली. या परिषदेत मराठी माणसांच्या घरासाठी दहा ठराव करण्यात आले आहेत.