

Mumbai Red Alert
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये शनिवारी ( दि.४) सकाळपासून सुरू झालेल्या अतिमुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून अनेक मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दरम्यान, दुपारी २.५० वाजता समुद्राला ४.२६ मीटर उंचीची भरती येणार असल्याने सखल भागांमध्ये पाणी साचण्याची भीती अधिक वाढली आहे.
शनिवारी सकाळी साडेदहानंतर पावसाचा जोर वाढत गेला. दुपारपर्यंत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आणि दैनंदिन जनजीवनावर परिणाम झाला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईतील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना दुपारच्या सत्रासाठी सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
अतिवृष्टीमुळे अंधेरीतील मोगरा नाला तुडुंब भरून वाहत असून त्याला जोडलेले लहान नालेही ओसंडून वाहत आहेत. परिणामी अंधेरी सबवे आणि परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
चेंबूरमधील नूर-ए-इलाही सेवा रस्ता, अंधेरीतील वीरा देसाई रस्ता, महानगरपालिका बाजारपेठ मार्ग, स्वामी विवेकानंद मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग, विक्रोळी येथील हुमा मॉल जंक्शन, गांधीनगर जंक्शन तसेच परेश पार्क बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांनी या मार्गांवर प्रवास टाळून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.