

मुंबई : तापमानातील वाढ पाहता मुंबईत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मुंबई केंद्राच्या माहितीनुसार, रविवारी किमान 23 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सोमवारी पारा 37 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. आयएमडीने सोमवारी उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात उष्ण लहरी जोरदार सक्रिय झाल्या असून, कमाल तापमान 38 ते 40 अंशांवर पोहोचले आहे. त्यामुळे 18 जिल्ह्यांना आगामी दोन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मार्चच्या सुरुवातीपासून तापमानामध्ये कमालीची वाढ झाली आहे. सरासरी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस इतके आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव पूर्णपणे कमी झाल्यामुळे उन्हाचा कडाका वाढला आहे.
भारतीय हवामान विभागाच्या निकषांनुसार, सलग दोन दिवस कमाल तापमान 37 अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहिल्यास उष्णतेची लाट घोषित केली जाते. गेल्या आठवड्यात, 5 मार्चला (38 अंश सेल्सिअस) 2026मधील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
सांताक्रूझ वेधशाळेमध्ये मार्च महिन्यातील सर्वाधिक दिवसाचे तापमान 41.7 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. 28 मार्च 1956 रोजीचे हे विक्रमी तापमान आहे.