

मुलुंड : क्षुल्लक कारणावरून जीवघेणे हल्ले मुंबईत वाढले असून गुरुवारी दोन शाळकरी मुलांमध्ये चक्क रेल्वे रुळावर झालेली हाणामारी मुंबईत चर्चेचा विषय ठरली आहे. मुलुंड रेल्वे स्थानकावर सकाळी गर्दीच्या वेळी ही घटना घडली असून जीवाची पर्वा न करता हे दोघे एकमेकांच्या जीवावर उठले होते.
यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. प्रवाशी त्यांना सतर्क करीत होते. मात्र कोणतेही भान त्यांना नव्हते. या घटनेचे चित्रीकरण प्रवाशांनी केले असून ते व्हायरल झाले आहे. मुलुंड रेल्वे स्थानकावरील फलाटावर दोघांमधील भांडण सुरू झाले. मात्र हा वाद वाढतच गेला आणि ही झटापट रेल्वे रुळांवर पोहोचली. दोन्ही मुले एकमेकांच्या कॉलर आणि मानेला धरून एकमेकांना मारहाण करीत होती. याचवेळी प्लॅटफॉर्मच्या दिशेने एक रेल्वेगाडी येत होती. मात्र याचेही भान त्यांना नव्हते. त्यामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनली.
या धोक्याची त्यांना जाणीव नसल्याचे पाहून फलाटावरील प्रवाशी त्यांना आरडाओरड करीत ट्रेन येत आहे... असे सांगत होते. मात्र याचीही ते दखल घेत नव्हते. अखेर काही प्रवाशांनी रुळावर उडी मारत त्या दोघांना धरून प्लॅटफॉर्मवर घेऊन आले. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र तरीही त्यांचे भांडण संपले नाही. प्लॅटफॉर्मवर पोहोचताच त्यांच्यात पुन्हा हाणामारी सुरू झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
दोन मुलांमध्ये रेल्वे रूळांवर ही हाणामारी झाली. मात्र आरपीएफ किंवा पोलीस कर्मचारी तेथे कुठेही आलेले दिसत नाहीत. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सोशल मिडियावर रेल्वे प्रशासनाला ट्रोल करण्यात येत आहे.