मुंबई : फलाटाच्या विरुद्ध दिशेने मेल एक्सप्रेस पकडताना पडून झालेला मृत्यू हा अपघातच असल्याचे स्पष्ट करीत उच्च न्यायालयाने पीडित कुटुंबियांना मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने अनुचित घटनेची व्याख्या या अपघाताला लागू होत नसल्याने पीडिताच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देता येणार नसल्याचा रेल्वे प्रशासनाचा दावा फेटाळून लावत 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले.
लक्ष्मण राठोड आपल्या कुटुंबासह एक्सप्रेस मेलने प्रवास करत होते. त्यावेळी एका स्थानकावर लघुशंकेसाठी राठोड फलाटाच्या विरुद्ध दिशेने मेलमधून उतरले. मात्र अचानक ट्रेन सुरू झाली, तेव्हा धावती ट्रेन पकडताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडून ट्रेनखाली आले, ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रेल्वे प्रशासनाने या अपघातात संपूर्णपणे त्या व्यक्तीचीच चूक असल्याचा ठपका ठेवत राठोड कुटुंबाला नुकसान भरपाई नाकारली. त्याविरोधात पीडिताच्या कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.
या याचिकेवर न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी रेल्वे प्रशासनाने अपीलालाच आक्षेप घेतला. अनुचित घटनेची व्याख्या या अपघाताला लागू होत नाही. त्यामुळे या प्रकरणात पीडिताच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देता येणार नाही, असा दावा केला. न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला.
रेल्वेने आपला दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस पुरावा सादर केलेला नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने पीडिताच्या कुटुंबाला 4 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच 2011 मध्ये घटना घडल्याच्या दिवसापासून या रकमेवर 6 टक्के व्याजही पीडित कुटुंबाला देण्यात यावे, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.
या अपघातात धावती ट्रेन पकडताना पीडिताचा जीव गेला हे महत्त्वाचे आहे. हे आत्महत्येचे प्रकरण नाही, पीडिताकडे प्रवासाचे वैध तिकीट होते. त्याने लघुशंकेसाठी मेलमधून उतरणे अपेक्षित नाही. मात्र ट्रेनमधून उतरण्याचे कारण काहीही असले तरी सुटलेली ट्रेन पकडतानाच हा अपघाता झालेला आहे. हा मुद्दा नुकसानभरपाई ठरवताना विचारात घ्यायला हवा होता. या पीडिताचा मृत्यू ट्रेनच्या धडकेत झालेला नाही. तर धावती ट्रेन पकडतानाच त्याचा जीव गेलाय. तसा पोलीस रिपोर्ट असून प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनीही तशी साक्ष कोर्टात दिली. यावर हा अपघातच होता यावर शिक्कामोर्तब होते.