

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक (ड्रग इन्स्पेक्टर) परीक्षेत पेपरफुटी आणि गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडियावर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर फिरल्याचा दावा करण्यात येत असून, याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, एमपीएससीने हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावत भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झाल्याचा दावा केला आहे. २२ मार्च २०२६ रोजी झालेल्या औषध निरीक्षक भरती परीक्षेची प्रश्नपत्रिका दोन दिवस आधीच काही उमेदवारांकडे पोहोचल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात आला आहे.
तसेच गुणवत्ता यादीतील काही उमेदवारांचे गुण संशयास्पद असल्याचा आणि कट-ऑफपेक्षा कमी गुण मिळालेल्यांनाही मुलाखतीसाठी बोलावल्याचा दावाही करण्यात आला आहे. या आरोपांसंदर्भात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार सादर करण्यात आल्याचे संबंधितांकडून सांगण्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासनातील सूत्रांनीही या संदर्भातील तक्रार प्राप्त झाल्याची माहिती दिली असून, तक्रारीतील बाबी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठवून आवश्यक ती पडताळणी करण्याची शिफारस करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांनी सर्व आरोप फेटाळून लावत भरती प्रक्रिया महिनाभरापूर्वीच पूर्ण झाली असून निकालही जाहीर झाल्याचे सांगितले. निकालानंतर आयोगाची प्रतिमा मलीन करण्यासाठी चुकीची माहिती पसरविली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
तक्रारीत तथ्य आढळल्यास चौकशी केली जाईल; मात्र आरोप खोटे ठरल्यास अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा इशाराही आयोगाने दिला आहे. या परस्परविरोधी दाव्यांमुळे औषध निरीक्षक भरती प्रक्रियेबाबत उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.