

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण खात्यातील शाळा निरीक्षक संवर्गातील रिक्त असलेली ४४ पदे ऑनलाईन अर्ज मागवून, बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन परिक्षा मुंबई शहरात घेण्यात येणार आहे. असा प्रस्ताव शुक्रवारी शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.
यामुळे सन २०२२ पासून रिक्त असलेल्या निरीक्षक पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून तयार करण्यात आलेल्या प्रस्तावात उमेदवारांचे शैक्षणिक अर्हता, टीईटी परिक्षा, वय तसेच भरती कधी होईल याविषयी कुठलेही स्पष्टता नमूद केलेली नाही. यामुळे प्रस्तावावर आता विरोधी सदस्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जावू लागले आहेत.
मुंबई महानगरपालिका शिक्षण खात्यामध्ये शाळा निरीक्षक या संवर्गातील एकूण ८८ पदे असून ५०:५० अर्हतेनुसार, सरळसेवा व पदोन्नतीकरिता प्रत्येकी ४४ पदे उपलब्ध आहेत. शिक्षण विभागातील शाळांच्या पर्यवेक्षणीय यंत्रणेमधील सर्वांत महत्वाचे निरीक्षक पद असून या पदावरील अधिकाऱ्यांचे शाळा व शिक्षकांवर प्रत्यक्ष पर्यवेक्षण असते.
तसेच बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ च्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता निरीक्षक (शाळा) यांच्यावर अधिक जबाबदारी असते. या भरतीसाठी महानगरपालिकेने मे.टी.सी.एस.- आय.ओ.एन.(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड) या संस्थेची निवड केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेली शासनास भरावयाच्या मुद्रांक रक्कम, विधी लेखन साहित्य संस्थेकडून भरण्यात येणार आहे.
शाळा निरीक्षकांची कामे काय असतील?
निरीक्षक (शाळा) या पथावरील कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील मुंबई पब्लिक स्कूल्स, मनपा प्राथमिक, मनपा माध्यमिक व खासगी प्राथमिक शाळांना दरमहा किमान चाळीस (यापैकी २० अकस्मिक भेट) भेटी देणे, शालेय भेटीत शिक्षकांना शैक्षणिक मार्गदर्शन करणे, प्रशासकीय कामांची वेळोवेळी तपासणी करणे तसेच संबंधित शाळांच्या मुख्यांना मार्गदर्शन करणे आदीं प्रमुख कामे पार पाडावी लागतात.