

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या अन्न आणि औषध निरीक्षक पदभरतीच्या पेपरफुटी प्रकरणात आयोगातील तीन अधिकाऱ्यांना अटक झाल्याने आयोगाचे अध्यक्ष आणि सचिव यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आमदार बच्चू कडू यांनी केली.
त्यांच्या राजीनाम्याची मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पेपरफुटीचा मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी आयोगाचे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते, गोपाळ मराठे आणि अवर सचिव अभिजित लेंडवे यांना अटक केली आहे. एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या राजीनाम्याची मागणी कडू यांनी केली आहे. प्रसंगी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.