

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणातील आपल्या घरी जाण्याची ओढ लागलेल्या मुंबईतील चाकरमान्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून 'मोदी एक्स्प्रेस' ही विशेष मोफत रेल्वेसेवा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाचे हे सलग १३ वे वर्ष असून, यंदा कोकणवासीयांच्या सेवेसाठी एक नव्हे, तर दोन विशेष रेल्वे गाड्या धावणार असल्याची घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.
गेली १२ वर्षे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणातील गणेशभक्तांसाठी ही मोफत रेल्वेसेवा अविरतपणे सुरू आहे. या सेवेमुळे हजारो चाकरमान्यांना सणासुदीच्या काळात मोठा दिलासा मिळतो. यावर्षीच्या 'डबल धमाका' आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना मंत्री नितेश राणे म्हणाले, "लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने भारतीय जनता पार्टी आणि राणे कुटुंबीयांवर भरभरून विश्वास दाखवला. कणकवली, देवगड आणि वैभववाडीच्या जनतेने मला तिसऱ्यांदा आपला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले. या प्रेमाबद्दल आणि आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, यावर्षी आम्ही दोन विशेष 'मोदी एक्स्प्रेस' चालवण्याचा निर्णय घेतला आहे." या दोन्ही गाड्यांमधील सर्व प्रवाशांसाठी मोफत जेवण आणि पाण्याची सोय देखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी दोन वेगवेगळ्या दिवशी गाड्या सोडण्यात येणार आहेत. तिकीट वाटप सोमवार, दिनांक १८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. इच्छूक प्रवाशांनी आपल्या भागातील मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधून नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
पहिली रेल्वेगाडी (शनिवार, २३ ऑगस्ट २०२५)
सुटण्याची वेळ आणि ठिकाण: सकाळी ११:०० वाजता, दादर स्टेशन, प्लॅटफॉर्म क्रमांक १४.
थांबे: रत्नागिरी, कुडाळ.
अंतिम थांबा: सावंतवाडी.
दुसरी रेल्वेगाडी (रविवार, २४ ऑगस्ट २०२५)
सुटण्याची वेळ आणि ठिकाण: सकाळी ११:०० वाजता, दादर स्टेशन, प्लॅटफॉर्म क्रमांक १४.
थांबे: वैभववाडी, कणकवली.
अंतिम थांबा: कणकवली.
गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणारी ही 'मोदी एक्स्प्रेस' कोकणवासीयांसाठी एक पर्वणी ठरली आहे. "या 'डबल धमाका' विशेष मोदी एक्स्प्रेसचा सर्व कोकणवासीयांनी लाभ घ्यावा आणि आपला गणेशोत्सवाचा प्रवास सुखाचा करावा," असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. या उपक्रमामुळे सणांच्या दिवसात होणारी गर्दी आणि खासगी वाहतुकीचा खर्च टाळून हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.