रायगड : कोकणवासियांचा सर्वात मोठा सण गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात निघाले आहेत. 7 सप्टेंबरपासून सुरु होणार्या गणेशोत्सवासाठी 4 हजार 500 एस.टी. बसेस कोकणात दाखल होत आहेत. या एसटी बसेस नागपूर, नाशिक विभागातून दाखल होणार असल्या तरी नुकत्याच झालेल्या एसटी कर्मचार्यांच्या संपामुळे या बसेस कोकणात दाखल होणार विलंब झाला आहे. आता संप मिटल्यानंतर एकाच वेळी एसटी बसेस मुंबई-गोवा मार्गावर धावू लागल्याने प्रचंड वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून कोकणावासियांची चांगलीच रखडपट्टी होत आहे. (Ganesh Chaturthi 2024)
गणेशोत्सव आणि कोकणवासियांचे एक अतूट नाते आहे. कोकणवासिय वर्षभर या सणाची आतुरतेने वाट बघत आहे. मुंबई, ठाणेसारख्या मोठ्या शहरांत गणेशोत्सवाचा मोठा थाटमाट असला, तरी गावच्या मूळ घरी येणार्या गणरायाचे चाकरमान्यांना वेध लागले आहेत. दोन दिवसांवर आलेल्या गणपतीच्या स्वागताला गाव गाठण्यासाठी चाकरमान्यांची धावपळ सुरू आहे. सामानाची बांधाबांध सुरू आहे. त्यातच यंदा गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणार्या चाकरमान्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
महामंडळानेदेखील गणपती स्पेशल गाड्यांची संख्या वाढविली आहे. गेल्यावर्षी 4 हजार 300 गणपती स्पेशल गाड्यांनी दोन लाख चाकरमानी कोकणात गेले होते. यंदा तब्बल 4 हजार 500 एस.टी. बसेसमधून सुमारे अडीच लाख कोकणावासीय प्रवास करणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 3 हजारहून अधिक एस.टी. बसेस येणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक हजार एस.टी. बसेस येणार आहेत. 5 सप्टेंबरला सर्वाधिक एसटी बसेस कोकणात येणार आहेत. 6 सप्टेंबरला एक हजार, 7 रोजी 300 गाड्या कोकणात दाखल होणार आहेत.