

मुंबई: भायखळा येथील उमरखाडी परिसरातील ३६ इमारतींच्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. म्हाडाच्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने या इमारतींच्या समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव गृहनिर्माण विभागाला पाठवला आहे.
उमरखाडी हा ६.२३ एकरचा परिसर असून यात उपकरप्राप्त, पीएमजीपी आणि खासगी अशा ८१ इमारती आहेत.
यात १ हजार ९२८ निवासी आणि २६८ अनिवासी गाळे आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ ३६ इमारतींचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. येथे ४० ते ८१ मजल्यांच्या इमारती बांधल्या जातील. यापूर्वी दुरुस्ती मंडळाने कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पाचा प्रस्तावही शासनाला पाठवला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे येत्या काळात आदर्शनगर, श्रीकृष्णनगर, गोराई, चारकोप, इत्यादी अनेक समूह पुनर्विकास प्रकल्प हाती घेतले जाणार आहेत. सध्या मोतीलालनगर समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी विकासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
हे सर्व प्रकल्प बांधकाम आणि विकास तत्त्वावर केले जाणार आहेत. यात मूळ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाईल. तसेच म्हाडाला काही घरे उपलब्ध होतील; मात्र मोठ्या प्रमाणावर घरे विकासकाकडे वळवली जाणार आहेत.
दुरुस्ती मंडळाने मात्र उमरखाडीचा पुनर्विकास स्वत:च करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण उमरखाडीचा पुनर्विकास केला जाईल. मात्र पहिल्या टप्प्यात केवळ ३६ इमारतींचा पुनर्विकास होईल. उर्वरित इमारतींसाठी दुसऱ्या टप्प्याचा प्रस्तावही लवकरच शासनाला पाठवला जाणार आहे.