

म्हाडासाठी राखीव घरे न देणाऱ्या विकासकांवर कारवाई करा : मंत्री लोढा मुंबईकरांचा म्हाडावर वाढता विश्वास : गृहनिर्माण राज्यमंत्री
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबई मंडळाच्या २ हजार ६४० घरांची सोडत गुरुवारी वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात पार पडली. याच वेळी मुंबई मंडळाची पुढील सोडत जानेवारी २०२७मध्ये होणार असल्याचे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी जाहीर केले. यामुळे यंदाच्या सोडतीत विजेता न ठरलेल्या अर्जदारांना दिलासा मिळाला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळाची सोडत गुरुवारी रंगशारदा सभागृहात काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी मुंबई उपनगराचे सह पालकमंत्री मंगलप्रभात लोढा गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, महापौर रितू तावडे, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे आदी उपस्थित होते.
म्हाडाने गेल्या ३ वर्षांत २५ वेळा सोडत काढली. या माध्यमातून ५० हजार घरांच्या चाव्या विजेत्या रहिवाशांच्या हाती देण्यात आल्याचे सांगून जयस्वाल म्हणाले, येत्या काळात म्हाडा ९२५ एकर जागेवर समूह पुनर्विकास प्रकल्प राबवणार आहे. या अंतर्गत ६५ हजार कुटुंबांचे पुनर्वसन केले जाईल. ३० हजार घरे म्हाडाला उपलब्ध होतील व १ लाख घरे खासगी विकासकांना उपलब्ध होणार आहेत. ३० लाख घरांचे उद्दिष्ट ग्रोथ हबमध्ये मुंबई महानगर प्रदेशाचा समावेश असल्यामुळे ३० लाख घरांचे उद्दिष्ट शासनाने ठेवले आहे.
यापैकी २२ लाख घरे एसआरएच्या माध्यमातून झोपडपट्टी पुनर्विकासाद्वारे उपलब्ध होणार असून ८ लाख घरे म्हाडा व इतर सर्व यंत्रणांमार्फत उभारली जाणार आहेत. त्यामध्ये एकट्या म्हाडाने साडेसात लाखांहून अधिक घरांचे उद्दिष्ट स्वीकारले आहे. नवीन गृहनिर्माण धोरणानुसार आता नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, वृद्धाश्रम, विद्यार्थी वसतिगृहे आणि औद्योगिक कामगारांसाठी घरे बांधली जाणार आहेत.