

नवी मुंबई : तरुणाईच्या आवडी-निवडीमध्ये झालेले बदल, महागाई आणि पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी पतंग उडविण्याविरुद्ध सुरु असलेली जनजागृती, सोशल मीडियावरील असणारे गेम्स आदी विविध कारणांमुळे यंदा पतंग-मांजावरच संक्रांत आली आहे. एकेकाळी संक्रांतीच्या आठवडाभर आधीपासून पतंग शौकिनांच्या गर्दीने फुलून जाणारी दुकाने मात्र यंदा ओस पडली आहे.
यंदा पतंग-मांजाच्या विक्रीमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी घट झाली असून विक्रेते चिंतेत पडले आहेत. मागील काही वर्षांत संगणकाच्या महाजालात अडकलेल्या तरुणाईला संगणक, मोबाइलचीही भुरळ पडली आहे. तासन्तास संगणक किंवा मोबाइलवर खेळ खेळण्यात गुंग झालेल्या तरुणांना मैदानी खेळांचा विसर पडला आहे. इतकेच नव्हे, तर पतंग उडविण्यातही तरुणांना रस राहिलेला नाही. मागील पाच वर्षांत पतंग-माजा विक्रीमध्ये मंदी आली आहे.
यंदा तर 50 टक्कयांनी विक्री घटली आहे, अशी व्यथा पतंग विक्रेते अभुगफर नेमन यांनी सांगितले. पूर्वी ऑक्टोबर महिना उजाडल्यानंतर आकाशात पतंग भिरभरु लागायचे. दिवाळीच्या सुट्टीमध्ये तर लहान मोठ्यांपर्यंत सर्वच जण पतंग आणि फिरकी घेऊन पंतग उडवायचे. मकारसंक्रात म्हणजे पंतग शौकिनांसाठी पर्वणीच असायची. पतंग-मांजा खरेदीसाठी सक्रांतीच्या आठवडाभर आधीपासून दुकानांमध्ये गर्दी असायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. पतंग शौकिनांनी आता पाठ फिरवली असल्याचे विक्रेते अभुगफर नेमन म्हणाले.
मकरसंक्रात आल्यामुळे ऑफिस तसेच घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी पतंगांचा वापर केला जात आहे. त्यासाठी छोटे पतंग बाजारात आले आहेत. 100 पतंग 350 रुपयांना मिळत आहेत, तर डेकोरेशनसाठी असणाऱ्या पतंगांना जास्त मागणी असल्याचे विक्रेते रामजी गौडा यांनी सांगितले.
पंतगनिर्मितीच्या कामामध्ये कौशल्याची आवश्यकता आहे. एकेकाळी पंतग बनविणारे कसबी कारागीर होते. परंतु काळाच्या ओघात या कारागिरांची संख्या घटत गेली मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला. आजघडीला पतंग बनविणाऱ्या कारागिराला दिवसभरासाठी 300 ते 400 रुपये दिले जातात. मात्र अन्य ठिकाणी काम केल्यावर 500 ते 600 रुपये रोजंदारी मिळत असल्याने कारागीर पतंग निर्मितीचे काम करायला तयार होत नाहीत. परिणामी, कारागीरांचा अभाव ही देखील एक मोठी समस्या या व्यावसायिकांना भेडसावू लागली आहे. एकेकाळी पन्नास पैशांना पतंग मिळत होता. परंतु आज तोच पतंग 15 रुपयांना मिळू लागला आहे. वाढत्या महागाईचा हा परिणाम असल्यामुळे आता हा व्यवसायच अडचणीत येऊ लागला आहे, असे अभुगफर नेमन यांनी सांगितले.