

Maharashtra tourism |
मुंबई : महाराष्ट्र पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याकरिता राज्य शासन महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल (पर्यटन मित्र) स्थापन करणार आहे. पर्यटन क्षेत्रातील वाढत्या संधी, नैसर्गिक, सांस्कृतिक विविधतेचा विचार करता पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा अनुभव देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्रात 1 लाख कोटींची खासगी गुंतवणूक आणि 18 लाख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. येत्या 2 ते 4 मे, 2025 दरम्यान पार पडणार्या सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर महोत्सवात महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. राज्यात येणार्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच राज्यातील संस्कृती, इतिहास, पर्यटनस्थळे, कायदा, नियम, पर्यटनाविषयी आवश्यक माहिती देण्यासाठी राज्यात पर्यटन स्थळावर पर्यटकांच्या सेवेसाठी पर्यटन पोलिसांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे. यासाठी राज्य सुरक्षा मंडळाने व मेस्कोने त्यांच्याकडे असलेल्या कर्मचार्यांची माहिती सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाने दिले आहेत.
राज्यातील पर्यटन स्थळे, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरविणे हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असणार आहे, असे मंत्री देसाई यांनी सांगितले. हे दल पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांवर सीसीटीव्ही, हेल्पलाईन आणि तत्काळ प्रतिसाद यंत्रणा यासारख्या सुविधा उपलब्ध होतील, असेही देसाई म्हणाले.
येत्या 2 ते 4 मेदरम्यान पार पडणार्या महाबळेश्वर महोत्सवात सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून 25 जवानांची नियुक्ती करण्यात येईल. या जवानांना पर्यटकांच्या आवश्यक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे दल 31 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यरत राहील. महाबळेश्वर महोत्सवातील प्रायोगिक तत्त्वावरील यशस्वी अंमलबजावणीनंतर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन केले जाईल.