

मुंबई: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून येत्या 21 जूनला शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षेला विक्रमी नोंदणी झाली आहे. राज्यभरातून तब्बल सहा लाख उमेदवार संबंधित परीक्षा देणार आहेत.
परीक्षा परिषदेने 25 मार्चला टीईटीचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर 27 मार्च ते मुदतवाढीसह 24 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आली होती. आता अर्जांची अंतिम प्रक्रिया सुरू आहे.
टीईटी परीक्षेचे अर्ज करणाऱ्या उमेदवारांना 9 ते 21 जूनदरम्यान प्रवेश अर्जाची मुद्रित प्रत उपलब्ध करून दिली जाणार आहे. 21 जून रोजी सकाळी साडेदहा ते एक या वेळेत टीईटी पेपर क्रमांक 1 होईल. त्यानंतर पेपर क्रमांक 2 दुपारी अडीच ते पाचदरम्यान होणार आहे.
राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित इत्यादी शाळांमध्ये शिक्षणसेवक, शिक्षकपदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.
तसेच, सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तर, शिक्षण विभागाकडून सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांना मुख्याध्यापक किंवा अन्य पदोन्नती हवी असेल तर टीईटी उत्तीर्ण शिक्षकांनाच पदोन्नती द्यावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
त्यामुळे आता सेवेत असलेल्या शिक्षकांना किंवा शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. त्यामुळे टीईटी परीक्षा देणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
गतवर्षीची आकडेवारी
गेल्यावर्षी परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर 2025 रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला दोन्ही पेपर मिळून 4 लाख 75 हजार 669 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 लाख 46 हजार 730 उमेदवारांनी परीक्षा दिली, तर 28 हजार 939 उमेदवारांनी दांडी मारली, तर संबंधित परीक्षेत तब्बल 50 हजार 369 उमेदवार उत्तीर्ण झाले होते.
विषयतज्ज्ञांकडून योग्य प्रश्नपत्रिका तयार करण्याचे काम सुरू असून, येत्या 21 जूनला परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात येत आहे. यंदा अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे जबाबदारी देखील वाढल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले.