

मुंबई: शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादेची अट असल्यामुळे अनेकांचे शिक्षक होण्याचे स्वप्न अपूर्ण राहात होते. परंतु राज्य शिक्षण आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकानुसार नववी ते बारावीच्या खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षक भरतीसाठी इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरू असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ च्या आधारे मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थांमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीबाबत शिक्षण आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सविस्तर सूचना जाहीर केल्या आहेत.
पवित्र प्रणालीवर उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्राद्वारे नोंदवलेल्या माहितीच्या आधारे पदांसाठी तात्पुरती शिफारस करण्यात आली आहे. परंतु, नियुक्ती देण्यापूर्वी उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करणे बंधनकारक केले आहे. स्व प्रमाणपत्रातील माहिती आणि मूळ कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही.
टीईटी पात्रतेचीही अट
इयत्ता पहिली ते पचवीसाठी महाटीईटी / सीटीईटी पेपर १, तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी संबंधित विषयानुसार पेपर २ पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी शैक्षणिक, व्यावसायिक, जात, जात वैधता, दिव्यांग, समांतर आरक्षण आदी लागू कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
शिक्षण विभागाच्या सूचनेनुसार, खासगी व्यवस्थापनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीसाठी सेवा शर्तीच्या नियमांनुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या गटातील शिक्षक पदांसाठी कमाल वयोमर्यादा लागू राहणार नाही.
मात्र संबंधित शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निर्धारित मुदतीत प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. इयत्ता नववी ते दहावीसाठी उमेदवाराकडे पदवीस्तरावर किमान उत्तीर्ण श्रेणी असणे, तर इयत्ता अकरावी ते बारावीसाठी पदव्युत्तर स्तरावर किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शिफारस झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी २ ते ५ सप्टेंबर दरम्यान करण्याचे नियोजन आहे. पात्र उमेदवारांसाठी पदस्थापनेचे समुपदेशन ७ ते ११ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. उमेदवारांची संख्या कमी असल्यास ५ सप्टेंबरपूर्वीच नियुक्तीची कार्यवाही करण्यात येणार आहेत.