

मुंबई: राज्यातील अनेक भागांत पावसाने दडी मारली आहे. पावसाने दीर्घ खंड दिल्याने अनेक भागातील पिके धोक्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच, राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचा अंदाज घेऊन पाणी वापरासाठी नियोजन करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत राज्यातील पाऊसपाण्याचा आढावा घेण्यात आला. यासंदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना माहिती दिली. राज्यातील काही भागांत पावसाची तूट लक्षणीय आहे.
विदर्भात सुमारे ३५ टक्के पाऊस कमी झाला असून, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचे प्रमाण कमी आहे. अनेक ठिकाणी पिके आणि पाण्याची उपलब्धता अडचणीत आली आहे. त्यामुळे एकीकडे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे, तर दुसरीकडे पिकांना वाचविण्यासाठी आवश्यक ते सिंचन उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ज्या भागांत पावसाची मोठी तूट आहे, तेथे पिकांची स्थिती तपासून आवश्यक ती मदत करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. अशा भागात सर्वेक्षणाचे आदेश मुख्य सचिवांना देण्यात आल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. तसेच, पिकांना पाणी देण्यासाठी दिवसाला १२ तास वीज उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.