

मुंबई: अमली पदार्थांची तस्करी, साठवण आणि सेवनाविरोधात अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स आणि स्थानिक पोलिसांनी जानेवारी २०२६ ते एप्रिल २०२६ या कालावधीत एक हजार १४४ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांमध्ये एक हजार ६२६ आरोपींना अटक केली असून कारवाईदरम्यान सुमारे २५४ कोटी ५२ लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे.
टास्क फोर्समधील दिलेल्या माहितीनुसार २०२६ मध्ये विविध भागांत अनेक गुन्हे नोंदवून हजारो आरोपींना अटक करण्यात आली आहे. २०२५ मध्ये टास्क फोर्स व स्थानिक पोलिसांनी एकत्रित केलेल्या कारवाईत ५२३ कोटी १७ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट केले.
मुंबईतील घाटकोपर परिसरात सीआयडीच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिला आरोपीच्या घरावर छापा टाकून २ किलो ३० ग्रॅम अमली पदार्थ जप्त केला. जप्त साठ्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत ५ कोटी ७५ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणात एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
नवी मुंबई आयुक्तालय क्षेत्रातील खारघर, कळंबोली, पनवेल, कामोठे, तळोजा आणि उरण परिसरात अमली पदार्थ संदर्भातील २५ गुन्हे दाखल केले असून ३६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडून सुमारे एक कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे एका कारवाईत २०.५४ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले. या जप्त मालाची अंदाजे किंमत ४ कोटी १६ लाख रुपये आहे.
मुंबई, नागपूरमधील आकडेवारी
मुंबई शहरात २०२५ मध्ये अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी १ हजार १९४ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये १ हजार ४५४ जणांना अटक करण्यात आली होती. नागपूर शहरात १८८ गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये ३१२ आरोपींना अटक करण्यात आली. तर सेवनाच्या ४२३ प्रकरणांची नोंद झाली.
कोल्हापूर परिक्षेत्रात जानेवारी २०२५ ते मार्च २०२६ या १५ महिन्यांत १२६ गुन्हे नोंद झाले. याप्रकरणी ६७७ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६७ कोटी ९ लाख रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. अमली पदार्थांच्या उत्पादनापासून वितरणापर्यंतची साखळी तोडण्यासाठी पुढील काळातही कारवाई आणखी कडक केली जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.