

मुंबई: सीईटी परीक्षा, केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया (सीएपी), शिष्यवृत्ती योजना तसेच विविध प्रवेश प्रक्रियांबाबत विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यातच मार्गदर्शन आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांच्या सेवेला बुधवार (१० जून) पासून सुरुवात होत आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये एकूण ४० केंद्रे उभारण्यात येत असून, त्यापैकी बहुतांश केंद्रे कार्यान्वित झाली आहेत.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या उपक्रमाचा आढावा घेण्यात आला. बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई, तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळाणकर तसेच जिल्हास्तरीय समन्वयक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतील प्रत्येक टप्प्यावर विश्वासार्ह आणि अचूक माहिती सहज उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी वारंवार मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये, तसेच अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, तांत्रिक अडचणी दूर करणे आणि प्रवेशासंदर्भातील शंकांचे निरसन स्थानिक पातळीवरच व्हावे, यासाठी ही केंद्रे उपयुक्त ठरणार आहेत.
राज्यातील ४० केंद्रांपैकी मुंबईत तीन, पुण्यात दोन आणि नागपुरात दोन केंद्रे असतील. सध्या २६ केंद्रांचे काम पूर्ण झाले असून सहा केंद्रे अंतिम टप्प्यात आहेत. उर्वरित आठ केंद्रेही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.
काय मिळणार सुविधा
सीईटी परीक्षा व सीएपी प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती व मार्गदर्शन
अर्ज भरणे, शुल्क भरणा, कागदपत्रे अपलोड करणे आदी सहाय्य
विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती व पात्रता मार्गदर्शन
अभ्यासक्रम, महाविद्यालये आणि करिअर निवडीसंदर्भात समुपदेशन
प्रेडिक्टिव्ह कौन्सेलिंग व करिअर मार्गदर्शन
सीईटी आणि सीएपी पोर्टलशी संबंधित तांत्रिक मदत
पेमेंट गेटवे, दस्तऐवज अद्ययावत करणे व इतर तांत्रिक अडचणींचे निराकरण
इंटर्नशिप आणि रोजगाराच्या संधींबाबत मार्गदर्शन
सीईटी विद्यार्थी सहाय्यता केंद्रांमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती योजना, करिअर मार्गदर्शन तसेच तक्रार निवारणाच्या सुविधा त्यांच्या जिल्ह्यातच उपलब्ध होतील. विशेषतः ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी ही केंद्रे मोठा आधार ठरणार आहेत. प्रवेश प्रक्रियेबाबतची माहिती, तांत्रिक सहाय्य आणि विविध शंकांचे निरसन यासाठी राज्यातील कोणत्याही विद्यार्थ्याला या केंद्रांची मदत घेता येणार आहे.
-चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षणमंत्री