

Crop Loss Relief
मुंबई : नुकत्याच झालेल्या पावसाने राज्यातील विविध भागात कापणी केलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अशा प्रकारे नुकसान झालेल्या शेतकर्यांना भरपाई देण्याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यात आला. यावेळी विविध मंत्र्यांनी, कापणी केलेल्या पिकांचे नुकसान झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि मदतीची माहिती दिली.
राज्यातील पाणीटंचाईच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकरने पुरवठा करण्याच्या गावांच्या संख्येत दोनशेने, तर टँकरच्या संख्येत 336 ने घट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांनी सांगितले.
राज्य मंत्रिमंडळाच्या 27 मे रोजी झालेल्या बैठकीत घरांच्या पडझडींच्या दुरुस्ती आणि पुनर्बांधणीकरिता तातडीने मदतीसाठी निधी द्यावा, अशा सूचना केल्या होत्या. त्यानुसार 49 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. कोकण विभागास पाच कोटी, पुणे विभागास 12 कोटी, नाशिक विभागास पाच कोटी, छत्रपती संभाजीनगर विभागास 12 कोटी, अमरावती विभागास पाच कोटी आणि नागपूर विभागास दहा कोटी असे एकूण 49 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.
खरीप 2025 आणि यापुढील कालावधीकरिता नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांच्या नुकसानीपोटी द्यायची भरपाई दर आणि निकष 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार देय राहतील. यामुळे एक जानेवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या सूचना अधिक्रमित करण्यात आल्या आहेत, असे सोनिया सेठी यांनी सांगितले.