

मुंबई : राज्यातील वीज ग्राहकांना स्वस्त वीज मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. 5 वर्षांत विजेचे दर एकूण 50 टक्क्यांनी कमी केले जातील व पहिल्या वर्षी 10 टक्क्यांची कपात केली जाईल , असे सांगितले होते पण वस्तुस्थिती याच्या उलट आहे. वीजदर कमी होणार नसून ते 16 टक्क्यांनी महाग होणार आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली.
अतुल लोंढे म्हणाले की, भाजपा व देवेंद्र फडणवीस यांच्या कथनी व करणीत फरक आहे. पाच वर्षात वीज दर कमी करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे जाहीर केले होते. पण महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे (एमईआरसी) 20 ते 40 टक्के वीज दर वाढीचा प्रस्ताव सादर केला आहे, त्यासंदर्भातील जनसुनावणी नागपुरात झाली असून हा सर्व खटाटोप अदानीच्या फायद्यासाठी केला जात आहे. यातून राज्यातील सर्वसामान्य वीजग्राहक व छोटे, मध्यम, लघु उद्योगाचे कंबरडे मोडणार आहे, असे अतुल लोंढे म्हणाले.
आधीच महागाई, बरोजगारीने पिचलेल्या जनतेवर फडणवीस यांनी वीज दरवाढीचा भार टाकण्याचा घाट घातला आहे. शेजारच्या गुजरात, कर्नाटक, तेलंगण राज्यात महाराष्ट्रापेक्षा विजेचे दर कमी आहेत. गुजरातमध्ये घरगुती वीज दर 3.0 ते 5.2 रुपये प्रति युनिट, कर्नाटकात 3.7 ते 7.3 रुपये प्रति युनिट, तेलंगणात 2 ते 10 रुपये प्रति युनिट दर असताना महाराष्ट्रात तेच दर 4.4 ते 12.8 रुपये प्रति युनिट आहेत. वीज निर्मितीसाठी लागणारा खर्च सर्व राज्यात सारखा असताना महाराष्ट्रातच वीज महाग का, असा सवाल अतुल लोंढे यांनी उपस्थित केला.