![भांडूप येथील जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया; दुरुस्तीचे काम सुरू](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F10%2FWhatsApp-Image-2022-10-14-at-11.51.06-AM.jpeg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई; पुढारी वृत्तसेवा : भांडुपमधील संभाजी चौक परिसरामध्ये १५० एम एम व्यासाची जलवाहिनी गुरुवारी (दि.१४) सकाळी साडेसातच्या दरम्यान फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. पालिकेच्या एस वार्डातील मेंटेनन्स खात्यातील कर्मचारी ही लाईन दुरुस्त करायचे काम करत आहे. साधारण दुपारी एक वाजेपर्यंत हे काम पूर्ण होण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मागील काही दिवस याच ठिकाणी ९०० एम एम व्यासाची जलवाहिनी ४ वेळा फुटली होती. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले होते. त्यानंतर विक्रोळी, कांजूर भांडूप, घाटकोपरमधील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा खंडित झाला होता. परंतु आता त्याच परिसरातील १५० एम एम व्यासाची जलवाहिनी फुटल्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला पुन्हा एकदा सामोरे जावे लागत आहे. जलवाहिन्या गंजलेल्या असल्यामुळे त्या सातत्याने फुटत आहेत. सध्या फुटलेल्या जलवाहिनीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, पुढील दीड तासात हे काम पूर्ण होईल, असे एस वार्ड मेंटेनन्स खात्याचे पालिका अधिकारी आनंद निकम यांनी सांगितले आहे.