

मुंबई: छाननी प्रक्रियेत 1 कोटी 70 लाख पात्र महिलांची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या भगिनींना योजनेचे पैसे नियमितपणे मिळत राहतील. मात्र, अपात्र लोकांचा लाभ तत्काळ बंद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 80 लाख लाभार्थींना वगळण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले.
अपात्र ठरलेल्या आणि केवायसी न केलेल्या लोकांचे पैसे आता कायमचे रोखले जातील. मात्र, ज्या पात्र महिला तांत्रिक अडचणींमुळे राहून गेल्या आहेत, त्यांच्यासाठी सरकार केवायसीची विंडो अजूनही ओपन ठेवण्यास तयार असल्याचे सांगत पात्र महिलांनी काळजी करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
पुरुषांकडून पैसे वसूल करणारच
योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या 14 हजार पुरुषांना अजिबात सोडले जाणार नाही; त्यांच्याकडून विनाविलंब पैशांची पूर्ण वसुली केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
पाच लाख सरकारी नोकरीतील महिलांनी घेतला लाभ
यामध्ये तब्बल 5 लाख महिला या सरकारी नोकरीत कार्यरत असतानाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 10 लाख लाभार्थ्यांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे तपासणीत आढळले आहे. धक्कादायक म्हणजे तब्बल 14 हजार पुरुषांनी डमी स्वरूपात घुसखोरी करून लाभ लाटल्याचे समोर आले आहे.