

Jayant Patil meets Devendra Fadnavis
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भेट घेतल्योन राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकाच वेळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय फेरबदलांच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. मात्र, या सर्व चर्चांवर शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी पडदा टाकला असून, ही भेट निव्वळ पूर्वनियोजित आणि प्रशासकीय कामासाठी असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' बंगल्यावर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. अजित पवार यांच्या पक्षातील दोन वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी अचानक दाखल झाले. मात्र, याच दरम्यान शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील वर्षा बंगल्यावर पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राज्याच्या आणि केंद्राच्या मंत्रिमंडळ फेरबदलांची चर्चा आणि दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए (NDA) सोबत जाणार का? अशा चर्चा सुरू असतानाच या तिन्ही नेत्यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते.
या सर्व चर्चांवर 'पुढारी न्यूज'शी बोलताना जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "मुख्यमंत्र्यांसोबतची माझी भेट ही पूर्णपणे पूर्वनियोजित होती. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत माझी कोणतीही संयुक्त भेट झालेली नाही, ना त्यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झाली आहे. आम्ही एकमेकांना तिथे भेटलो हा निव्वळ एक योगायोग होता."
आपल्या भेटीचे कारण स्पष्ट करताना जयंत पाटील यांनी सांगितले की, माझ्या मतदारसंघातील ईश्वरपुरचे नगराध्यक्ष ७००० मताने निवडून आले आहेत. त्यांच्या मामाने २२ वर्षांपूर्वी एका जागेत बांधकाम केले होते. ती जागा नगराध्यक्ष यांनी बक्षीसी प्रमाणे घेतली त्यावर अद्याप कोणती नोटीस आली नाही तरी जिल्हाधिकाऱ्यानी त्याना नोटीस देत अपात्र ठरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी भेटण्यास सांगितले होते. रात्री उशीरा बोलवले. मी हॉल मध्ये बसलो होतो आणि मुख्यमंत्री बऱ्याच वेळानंतर आले. मी त्यांना ईश्वरपूरमधील नगराध्यक्षांच्या कारवाईबाबत त्यांना माहिती दिली. या प्रश्नी माहिती घेऊन सांगतो असे मला म्हणाले."
वर्षा बंगल्यावर माझी प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्याशी माझी कधीच भेट झाली नाही. चहा घेतला आणि बऱ्याच वेळा नंतर बाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाहेर आले. मुख्यमंत्री कोणाशी भेटले मला माहिती नाही. मुख्यमंत्री येईपर्यंत मी फुटबॉल सामना पाहत होतो. तेव्हा अनेकांचा मेसेज आला की अशी चर्चा सुरु झाली आहे.
राष्ट्रवादी विलीनीकरणावर चर्चाच झालेली नाही. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर कधीच चर्चा झाली नाही. चर्चा थांबली असे म्हणता येणार नाही कारण चर्चाच सुरु झालेली नाही. विनोद तावडे यांच्या सोबत बैठक झाली.एका कार्यक्रमात गेल्यावर ते तिथे होते त्यांच्या सोबत कॉफी घेतली, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. आम्ही राष्ट्रवादी शरद पवार साहेब यांच्या मागे आहोत.वारंवार अशा चर्चा का येतायत याचा दुःख होते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केले.