मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे या तलावांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या २४ तासात सातही तलावातील पाणीसाठ्यात तब्बल ६८ हजार दशलक्ष लिटरने वाढ झाली. त्यामुळे पाणीसाठा २९.७३ टक्के म्हणजे ४ लाख ३० हजार दशलक्ष लिटरवर पोहचला आहे.
तलावातील पाणीसाठा ५ टक्केवर पोहचला होता. त्यामुळे मुंबईकरांवर भीषण पाणीटंचाईचे संकट ओढवणार होते. मात्र पावसाने मुंबईकरांवर कृपा दाखवल्यामुळे तलाव क्षेत्रात आता समाधानकारक पाऊस पडू लागला आहे. त्यामुळे पाणी साठ्यात वाढ होत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात पडलेल्या मुसळधार पावसामुळे तलावातील पाणीसाठ्यात २४ तासात ४.७३ टक्के वाढ झाली. म्हणजेच जवळपास ६८ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा वाढला.
शहराला दररोज पुरवठा होणाऱ्या ३९५० दशलक्ष लिटर पाण्याची तुलना केल्यास गेल्या २४ तासात किमान १८ दिवसाचा पाणीसाठा झाला. शहराला सर्वाधिक पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणी साठ्यानेही २ लाख दशलक्ष लिटरचा टप्पा ओलांडला आहे. अन्य तलावातीलही पाणीसाठ्यात वाढ होत असल्याचे जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले.