

ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतानने त्याच समकक्ष काम केले आहे. त्यामुळे टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.
मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौरांच्या दालनातील टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद निर्माण झालेला असतानाच आता सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानाने आणखी वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सपकाळ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य ज्या प्रकारचे आहे, त्यांनी जो स्वराज्याचा विचार दिला, त्याच प्रकारे त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला होता. त्या अर्थाने टिपू सुलतान हे शौर्य
गाजवणारे योद्धे होऊन गेले, भारताचे भूमिपुत्र होऊन गेले. त्यांनी कधीही कोणत्याही विषारी, विखारी विचारांना जवळ केले नाही. त्यामुळे शौर्याचे लक्षण म्हणून आपण टिपू सुलतान यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष पाहिले पाहिजे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ते बुलडाण्यात बोलत होते.
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे, असे वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करताना सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे. ही तुलना अतिशय निंदनीय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केले. मुघलांच्या जोखडातून सामान्य जनतेला मुक्त करण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने सामान्य रयतेचे राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याच वेळी लाखो हिंदूंची हत्या टिपू सुलतान याने केली. या दोघांची तुलना करून दोघांना सारखे सन्मान द्या असे म्हणणे यापेक्षा जास्त लांगूलचालन, जोडे चाटणे मी या जन्मात बघितले नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आम्ही हे अजिबात सहन करणार नाही. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. सपकाळ अशा पद्धतीने ते बोलत असतील आणि काँग्रेस पक्षात थोडीशी नैतिकता राहिली असेल तर पक्षाने यावर स्वतःची भूमिका मांडली पाहिजे, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.