

Harshvardhan Sakpal on Tipu Sultan controversy
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या संदर्भात केलेल्या विधानावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. "माझ्या विधानाचा विपर्यास करून भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी जाणीवपूर्वक अपप्रचार केला," असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
सकपाळ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "सरकारी कार्यालयांमध्ये विविध महापुरुषांचे फोटो एकत्र लावल्याने समाजात तेढ निर्माण होणार नाही, तर ऐक्याचा संदेश जावा, असा माझ्या ७० सेकंदांच्या वक्तव्याचा मूळ हेतू होता. दुर्दैवाने, त्यातील एका शब्दाचा संदर्भ तोडून चुकीचा समज पसरवण्यात आला."
राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी भाजपने हा खोडसाळपणा केल्याचे सांगत सकपाळ यांनी पुण्याच्या घटनेचा दाखला देत पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "मी जे बोललोच नाही, ते माझ्या तोंडी घालण्यात आले. भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. याआधारे राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला, हे आपण पुण्यात पाहिले आहे."
मी पुन्हा एकदा स्पष्ट आणि ठामपणे सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये,जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्या बद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता.शिवजयंती दोन दिवसांवर आली असल्याने नागरिकांनी कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नये.महाराजांनी दिलेला स्वराज्य आणि सहिष्णुतेचा मार्ग स्वीकारून महाराष्ट्र घडवूया, असे आवाहन करत इतिहासावर मतभेद असू शकतात, पण त्यावर अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी, समाजात संघर्ष नको.शेवटी, भाजपच्या 'विखारी' राजकारणाविरुद्ध आणि विविध घोटाळ्यांविरुद्ध आपला लढा सुरूच राहील, असा इशाराही हर्षवर्धन सकपाळ यांनी दिला आहे.
याप्रकरणी 'पुढारी न्यूज'शी बोलताना भाजप प्रवक्ते नवनाथ बन म्हणाले की, "सकपाळ म्हणतात की, भारतीय जनता पार्टी राजकारण करते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं भारतीय जनता पार्टीला राजकारण करण्याची कधीही गरज नाही. आता कुठल्याही निवडणुका नाहीत. परंतु आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा मुद्दा अस्मितेचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन केलं होतं आणि हर्षवर्धन सकपाळ यांना माफी मागायला, दिलगिरी व्यक्त करायला भाग पाडलं. उशिरा का होईना, पण भारतीय जनता पार्टीच्या जनरेट्यामुळेच हर्षवर्धन सकपाळ यांना माफी मागावी लागली, दिलगिरी व्यक्त करावी लागली."