

मुंबई: अल निनोचा शेतीवर होणारा संभाव्य परिणाम, पर्जन्यमानाची स्थिती आणि त्यानुसार पीक पद्धती यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
यंदाच्या खरीप हंगामात जास्तीत जास्त क्षेत्रावर पेरणी व्हावी यासाठी कृषी विभाग तयारी करीत आहे. खते व बियाणे वेळेत व पुरेशी उपलब्ध व्हावेत, यासाठी नियोजन केले जाईल. जिल्हानिहाय खते व बियाण्यांचा साठा, वितरण व्यवस्था आणि संभाव्य मागणी याचाही आढावा घेतला जाणार आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा ‘एल निनो’ स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते. मागील हंगामात सरासरीपेक्षा 109 टक्के असा समाधानकारक पाऊस झाला. ऑगस्ट 2025 मध्ये सरासरीच्या 104 टक्के, सप्टेंबर 2025 मध्ये 165 टक्के, तर ऑक्टोबर 2025 मध्ये 114 टक्के पाऊस झाला. विशेषतः सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली व शेतीला दिलासा मिळाला.
राज्यात सन 2025-26 च्या खरीप हंगामात 143.55 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली असून हे प्रमाण सरासरीच्या 99 टक्के आहे. त्यामुळे खरीप पेरणी जवळपास नियोजित क्षेत्रावर झाल्याचे स्पष्ट झाले.
रब्बी हंगामाचे सरासरी क्षेत्र 57.80 लाख हेक्टर असून सन 2025-26 मध्ये तब्बल 67.28 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हे प्रमाण सरासरीच्या 116 टक्के इतके असून रब्बी हंगामात अपेक्षेपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवड झाल्याचे दिसून आले.