पुढारी ऑनलाईन डेस्क
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी आज शुक्रवारी (दि.२६) सकाळी आणि दुपारच्या सत्रात होणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या या दोन जिल्ह्यांतील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाने X वर पोस्ट करत दिली आहे. (Raigad Ratnagiri Flood News)
हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला असून विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या रायगड (Raigad Flood News) आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आजच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत आणि लवकरच नवीन तारखा जाहीर केल्या जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संचालक पूजा रौदळे यांनी दिली आहे.
रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. तर सावित्री नदीची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी आहे. पुढील ३- ४ तासांत पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, मुंबई, पुणे आणि सातारा येथील घाट भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला.
जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालये (अंगणवाडी, पूर्व प्राथमिक व प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालय) विद्यार्थ्यांना आज शुक्रवार दि. २६ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी आदेश दिले आहेत.