

मुंबई: उद्धव ठाकरे गटाच्या सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही फक्त उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षाच्या केलेली गद्दारी नाही तर काँग्रेस महाविकास आघाडीशी सुद्धा त्यांनी गद्दारी केलेली आहे. जनतेने महायुतीच्या विरोधात मतदान करून विजयी केले, त्यांचा हा विश्वासघात आहे, अशा गद्दारांना यापुढे जनताच धडा शिकवेल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी दिला.
ठाकरे गटातून सहा खासदार बंडखोरी करून बाहेर पडले ते महाविकास आघाडीचे उमेदवार होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत या सहा जणांसाठीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचार केला, त्यांच्यासाठी कोणत्याही धमक्यांची पर्वा केली नाही.
जनतेने त्यांच्यावर विश्वास दाखवला, ही बंडखोरी या सर्वांचा अपमान आहे, या सहा खासदारांनी गद्दारी केलेली आहे. पैशासाठी लाचार झालेले हे लोक जनतेची सेवा करू शकत नाहीत, पैशाने विकले जाणारे हे लोक कोणाचेही नसतात, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.