

मुंबई: चेंबूर येथील एका शाळेच्या बसवर झाड कोसळून विद्यार्थ्याचा मृत्यू प्रकरणी पालिकेने चौकशी अहवाल गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केला. परंतु तो महापौर रितू तावडे यांनी अमान्य करत तो फेटाळून लावला आहे.
परिणामी आता आयआयटी मुंबई, या संस्थेकडून चौकशी करण्याचे पत्र महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना लवकरच लिहिणार असल्याची माहिती महापौर रितू तावडे यांनी दिली.
जून महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसात चेंबूरमध्ये एका स्कूल बसवर पिंपळाचे झाड पडून ११ वर्षीय विहान श्रीवास्तव या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. याबाबत विरोधकांनी महापालिकेच्या काराभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
या घटनेला महापालिका आयुक्त भिडे जबाबदार असल्याची टीका करण्यात आली होती. त्यामुळे या विषयावरून राजकीय घमासान सुरू झाले होते.
दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी पालिका प्रशासनाने सहाय्यक गार्डन अधिकारी, रस्ते अभियंता यांना निलंबित केले होते. तर उपायुक्त पुरुषोत्तम माळंवदे, उपायुक्त शशांक भोरे यांची समिती नेमली होती. या समितीने कंत्राटदारांला ५ लाख तर सल्लागार कंपनीला २ लाख रूपये दंड आकारला होता.
यामुळे महापौरांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनी चौकशी समितीच्या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच महापौर तावडे यांनी गुरुवारी महानगरपालिका सभागृहात सदर अहवाल फाडला होता. यामुळे अता मसानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे काय निर्णय घेतात, याकडे सत्ताधारीसह विरोधी सदस्यांचे लक्ष लागून राहिले आहे.