

पुढारी ऑनलाईन डेस्क : Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर त्यांचा वारसदार कोण असेल? मग तो महाराष्ट्रातील असेल का? आणखी कोण? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच वयाची ७५ वर्षे पूर्ण करणार असल्याने, ते निवृत्त होऊ शकतात, असे विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार अधोरेखित केले जात आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संघाला नेतृत्त्वात बदल हवा आहे, त्यामुळे पीएम मोदी निघून जात असल्याचे म्हटले होते, यावर राज्याचे महसूलमंत्री, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.
मंत्री बावनकुळे यांनी या संदर्भातील सोशल मीडिया एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, "उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे. 75 वर्षे वयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारण सोडावे, असा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही"
भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते आदरणीय अटलबिहारी वाजपेयी वयाच्या 79 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. तर मोरारजी देसाई (83 वर्षे) आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या 81 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजप द्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.
भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. 2047 पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदीजींनी केला आहे. हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल, असेदेखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.