

मुंबई : महापालिका व पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाई विरोधात मुंबईतील फेरीवाले बुधवारी आझाद मैदानात एकवटणार आहेत. सुरू असलेली कारवाई अन्यायकारक असून राज्यभर एकाचवेळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे जनवादी हॉकर्स सभेने जाहीर केले आहे.
फेरीवाल्यांना रोजगाराचे संरक्षण मिळावे व 2014 च्या फेरिवाला कायद्याची अंमलबजावणी व्हावी अशी त्यांची मागणी आहे. मुंबईतील आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात शहर व उपनगरांतील सुमारे 3 हजार फेरीवाले सहभागी होतील, अशी माहिती सभेचे राज्यसचिव के.नारायणन व राज्य कौन्सिल सदस्य शैलेंद्र कांबळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मनोज यादव हेही उपस्थित होते.
सातत्याने फेरीवाल्यांवर महापालिका व पोलीस प्रशासन अन्याय करीत आहे. गेल्या 25 ते 30 वर्र्षांपासून हा लढा सुरू आहे. फेरीवाल्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने कायदा पास केला आहे. मात्र या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, असे यावेळी के. नारायणन यांनी सांगितले.
मुंबईतील सर्व फेरीवाले हे मराठीच आहेत.पण सरकार व महापालिका प्रशासनाला काही फेरीवाले हे बांगलादेशी आहेत, अशी चुकीची माहिती कोणीतरी देत आहेत. मुंबई महापालिकेने 2014 ला फेरीवाल्यांचा सर्व्हे केला आहे. हा सर्व्हे तपासला तर किती बांगलादेशी फेरीवाले आहेत, हे सत्य बाहेर येईल. फेरीवाल्यांबाबत आमदार अमित साटम व महापौर रितू तावडे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सातत्याने कारवाई सुरू असल्याचे शैलेंद्र कांबळे यांनी सांगितले.