पुढारी ऑनलाईन डेस्क
बदलापूर येथील शाळेत चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ (Badlapur School Case) महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) शनिवारी (दि. २४) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकीय पक्ष अथवा व्यक्तीला महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारण्यास मनाई केली आहे. या ‘बंद’ला वकील सुभाष झा आणि गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायालयाने महाविकास आघाडीला बंद पुकारण्यासाठी रोखले आहे.
मुख्य न्यायमूर्ती डी. के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने सांगितले की, महाराष्ट्र सरकार बंद रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल. महाराष्ट्र बंदला आव्हान देणाऱ्या वकील सुभाष झा आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यामार्फत शुक्रवारी दाखल केलेल्या दोन याचिकांवर लवकरच ते तपशीलवार आदेश देतील. “आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला अथवा कोणत्याही व्यक्तीला बंदचे आवाहन करण्यापासून मनाई करत आहोत.'' असे न्यायमूर्तींनी सांगितले.
राज्याचे ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितले की, महाराष्ट्र बंदचे आवाहन करणे बेकायदेशीर आहे. "मानवी जीवन किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकार सर्व पावले उचलेल. राज्य आपले कर्तव्य बजावेल. पण प्रत्येकाच्या घटनात्मक जबाबदाऱ्या आहेत; त्या त्यांनी पाळल्या पाहिजेत," असे सराफ म्हणाले. न्यायालयाने सराफ यांना सवाल केला की, सरकारने काय प्रतिबंधात्मक पावले उचलली आहेत आणि कोणाला प्रतिबंधात्मक अटक केली आहे का?. त्यावर सराफ म्हणाले की, काही लोकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पण अद्याप कोणालाही प्रतिबंधात्मक अटक करण्यात आलेली नाही.
यावेळी वकील सुभाष झा आणि सदावर्ते यांनी केरळ उच्च न्यायालयाच्या एका निकालाकडे लक्ष वेधले; ज्यामध्ये असे म्हटले आहे की कोणताही राजकीय पक्ष राज्यव्यापी बंदचे आवाहन करु शकत नाही आणि अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचे उच्च न्यायालयाला पुरेसे अधिकार आहेत. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
बदलापूर येथील चिमुकलींवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी (दि. २४) महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे. उद्याचा बंद सर्व नागरिकांच्या वतीने पाळण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळून दुपारी २ वाजेपर्यंत बंद पाळण्यात येणार आहे. हा बंद राजकीय कारणासाठी नाही, तरी सर्व नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. २३) पत्रकार परिषदेत केले होते.