

मुंबई: मुंबईतील नालेसफाईबाबत मुंबईकर नाराज असताना कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीनेही या कामात अनेक त्रुटी शोधल्या आहेत. याबाबत आणि विलंबाबाबत मुंबई महापालिकेने कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे. तब्बल ९ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही रक्कम देयकांमधून वसूल करण्यात येणार आहे.
मुंबईत दरवर्षी पावसाचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून मुंबई महानगरातील मिठी नदी आणि मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. तर, विभाग कार्यालयांच्या (वॉर्ड) पातळीवर लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे केली जातात.
यंदा मार्चच्या पहिल्या आठवड्यात गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात आली. या कामांवर प्रभावी देखरेखीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय) प्रणाली विकसित केली होती. तसेच छायाचित्रण समवेत ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे.
तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य केले होते. प्राप्त सर्व व्हिडिओंचे पालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने विश्लेषण करण्यात आले. यात अनेक ठिकाणी त्रुटी आढळल्या. त्यामुळे कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई प्रशासनाकडून केली आहे.
असा आकारला दंड
मोठे नाले : १,३९,३९,३८०
लहान नाले : ६,११,८६,९५०
मिठी नदी : १,४८,५००