

मुंबई: विरार-बोळींज येथे म्हाडाने उभारलेल्या ९ हजार ५०० घरांच्या प्रकल्पातील रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी रहिवाशांनी वसई-विरार महानगरपालिकेवर मोर्चा काढला होता.
पुरेसे पाणी नसल्याने या प्रकल्पातील घरे वारंवार सोडतीत घेऊनही अर्जदारांचा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावर म्हाडाने ही घरे विकण्यासाठी सुरुवात केली. सध्या या वसाहतीत ६ हजार कुटुंबे राहात आहेत.
कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवाशांचे हाल होत असल्याची माहिती रहिवासी कृष्णा देवाडिगा यांनी दिली. मोर्चानंतर रहिवाशांना केवळ पाणीपुरवठ्याचे आश्वासन मिळाले आहे. रात्री साडेबारा वाजता पाणी येते. दाब कमी असल्याने पुरेसे पाणी मिळत नाही. तसेच अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो, अशा येथील रहिवाशांच्या तक्रारी असल्याची माहिती देवाडिगा यांनी दिली.