

मुलुंड : भांडुपमध्ये इलेक्ट्रिक बसच्या नुकत्याच झालेल्या दोन अपघातांनंतर बेस्ट उपक्रमाने पूर्व उपनगरांमध्ये गर्दीच्या व डोंगरी वस्त्यांसाठी मिडी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नऊ मीटरच्या 500 सीएनजी बस खरेदी करण्याचे ठरवले असून तसा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे.
या मिडी बसेस घाटकोपर, भांडुप, पवई, विक्रोळी आणि कांजूरमार्ग यांसारख्या भागांतील अरुंद आणि डोंगराळ मार्गांवर चालवल्या जाणार आहेत. रविवारी झालेल्या एका घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यात उभी असलेली एक इलेक्ट्रिक बस मागे सरकून रस्त्याच्या कडेला असलेल्या बूथला धडकली. प्राथमिक चौकशीत चालकाची चूक असल्याचे म्हटले गेले असून, हँडब्रेक लावला नसल्याचे सांगण्यात आले आहे.
मात्र, अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा मुद्दा केवळ मानवी चुकीपुरता मर्यादित नाही. मार्ग क्रमांक 605 आणि 606 सारख्या गर्दीच्या आणि उताराच्या रस्त्यांवर लांब बसेस हाताळणे अवघड असते. अशा प्रकारच्या भूभागासाठी लहान बसेस अधिक योग्य आहेत, असे बेस्टच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या पूर्वी 200 मिडी बसेस वाढवण्याची योजना आखली होती, परंतु आता अनेक मेट्रो कॉरिडॉरच्या शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीची गरज लक्षात घेऊन ही संख्या 500 पर्यंत वाढवली जाणार आहे.
मात्र, यासाठी आर्थिक प्रश्न उभा राहू शकतो. प्रत्येक बससाठी 40-50 लाख रुपये खर्च अपेक्षित असून, निधीची उपलब्धता अनिश्चित आहे. बेस्ट वेट लीजिंग, सरकारी अनुदान किंवा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून थेट आर्थिक मदतीसह विविध पर्यायांचा विचार करत आहे. हा उपक्रम आधीच कर्जाच्या दबावाखाली असल्याने, आर्थिक प्रारूप स्पष्टपणे निश्चित केले पाहिजे, असे बेस्ट समितीच्या एका सदस्याने सांगितले.
मेट्रो लाईनला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी मिडी बसची गरज
सध्या, बेस्ट वेट लीजद्वारे 600 हून अधिक मिडी बसेस आणि मर्यादित संख्येने नॉन-एसी तेजस्विनी बसेस चालवते. मात्र 2025 च्या अखेरीस अशा अनेक बसेस टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्या. अधिकाऱ्यांच्या मते, मेट्रो लाईन 1, 2ए, 2बी, 3, 7 आणि 9 ला कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आता किमान 315 अतिरिक्त मिडी बसेसची आवश्यकता असेल.
महापालिकेने बेस्टला नागरी व्यवस्थेचा अविभाज्य भाग मानून अधिक पाठिंबा देणे गरजेचे आहे. आर्थिक मदतीसाठी शासनाशी चर्चा झाली आहे. 2026-27 पर्यंत आपल्या ताफ्यात एकूण 5 हजार बसेसचा विस्तार करण्याचे बेस्टचे उद्दिष्ट आहे. परंतु हे लक्ष्य साध्य करणे वेळेवर मिळणाऱ्या निधी आणि बसेसच्या वितरणावर अवलंबून असेल.
तृष्णा विश्वासराव, अध्यक्षा, बेस्ट उपक्रम