

मालाड : राज्यातील मराठी शाळा बंद होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे राज्य सरकारने कानाडोळा केला आहे. परंतु राज्य सरकारच्या शैक्षणिक दृष्टीकोनाला छेद देत काही तरी करण्याची जिद्द व शिक्षणाची आस मनात बाळगून निवृत्त शिधावाटप अधिकारी महिलेने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. स्वखर्चातून वर्गखोल्या उभारून त्यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली केली आहेत. आसावरी देसाई असे या महिलेचे नाव आहे.
असावरी देसाई या शिधावाटप विभागात लिपिक म्हणून कार्यरत होत्या. त्या ठाणेयेथे वास्तव्यास असून त्यांचे मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे. आपल्या गावातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, हे त्यांचे स्वप्न होते.
सुरुवातीला गावात केवळ पहिली ते चौथीपर्यंतची शाळा होती. मात्र, पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दूरच्या ठिकाणी जावे लागू नये, या उद्देशाने देसाई कुटुंबाने पुढाकार घेत स्वतःच्या खर्चाने पाचवी ते आठवीपर्यंतच्या वर्गांसाठी शाळेची इमारत उभारली. या शाळेला "भास्कर-रुक्मिणी विद्यालय" असे नाव देण्यात आले. मात्र, असावरी देसाई यांचे स्वप्न केवळ आठवीपर्यंत मर्यादित नव्हते.
गावातील विद्यार्थ्यांना आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षणही गावातच मिळावे आणि त्यांना तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर गावांमध्ये जावे लागू नये, अशी त्यांची इच्छा होती. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, असा त्यांचा ठाम विश्वास होता.
सुमित्रा महाजन यांच्या सहकार्यामुळे २० लाखांचे अनुदान
दरम्यान, त्यांनी शासनाकडून आर्थिक मदत मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. तत्कालीन लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या सहकार्यामुळे २० लाख रुपयांचे अनुदान मिळाले. मात्र, ही रक्कम अपुरी असल्याने त्यांनी मित्रपरिवार, नातेवाईक आणि इतर माध्यमांतून आणखी १७ लाख रुपये जमा केले. अशा प्रकारे एकूण ३७ लाख रुपयांचा निधी उभारून आठवी ते दहावीचे वर्ग सुरू करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील
सागरुळ शिक्षण संस्थेच्या सहकार्याने करवीर तालुका, कोल्हापूर जिल्ह्यात हे शैक्षणिक कार्य साकार झाले. आज भास्कर-रुक्मिणी विद्यालय शैक्षणिक गुणवत्ता, सांस्कृतिक उपक्रम आणि शिस्त या सर्व बाबतीत उल्लेखनीय काम करत असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.
समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व
स्वतःसाठी प्रत्येकजण जगतो; मात्र इतरांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या आनंदासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यसमर्पित करणारे व्यक्तिमत्त्व फार कमी असतात. असावरी देसाई या अशाच समाजाभिमुख व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल समाजातून तसेच शिक्षण क्षेत्रातून त्यांचे कौतूक होत आहे.