

राजेंद्र पाटील
नवी मुंबई: अक्षय्य तृतीयेनिमित्ताने मुंबई सराफ बाजारात शनिवारी तेजी होती. सकाळी बाजार सुरू होताच सोन्याच्या दरात प्रतितोळे पाच हजार तर चांदीच्या दरात प्रतिकिलो दहा हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली.
रविवारी अक्षय्य तृतीयेला सोने व्यापाराची उलाढाल गेल्या वर्षाच्या तुलनेत 20 टक्क्यांनी अधिक होईल आणि तब्बल 120 टन सोने विक्री होईल, असा अंदाज इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केला.
मुंबईप्रमाणे नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि जळगाव सुवर्णनगरीत मोठी उलाढाल होईल. शुक्रवारी 17 एप्रिल रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅमसाठी 1 लाख 58 हजार 600 रुपये होते.
चांदी 2 लाख 50 हजार रुपये किलो होती. 18 एप्रिलला शनिवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात प्रती तोळ्यामागे पाच हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याच्या दराने जीएसटीसह 1 लाख 67 हजार 800 रुपयांचा दर नोंदवला. चांदीत किलोमागे 10 हजार रुपयांची वाढ झाल्याने 2 लाख 67 हजार 800 रुपये किलोपर्यंत पोहचली.
वाढलेल्या दरांमुळे अनेक ग्राहक जुने दागिने बदलून नवीन नक्षीचे दागिने घेण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामध्ये चाळीत मोड येत असून नवीन दागिने घडवून दिले जातात.लग्नसराई, गुंतवणूकदार आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून होत असलेली मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि देशोदेशीच्या मध्यवर्ती बँकांकडून त्यांच्या सुवर्ण साठ्यात केली जाणारी वाढ दरवाढीला कारणीभूत आहे.
चांदीत 10,000 रुपयांनी वाढ
मुंबईत शनिवारी चांदीचे दर प्रतिकिलो दोन लाख 60 हजार रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचले. गुरुवारी चांदीचे हेच दर प्रती किलो 2 लाख 50 हजार रुपये एवढे होते. म्हणजे चांदीत किलोमागे 10 हजार रुपयांची वाढ झाली. सकाळी बाजार उघडताच त्यात टप्प्याने वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीच्या दराने जीएसटीसह प्रतिकिलो 2 लाख 67 हजार 800 रुपयांच्या उच्चांकावर झेप घेतली.