

Akshay Kumar Interview Devendra Fadnavis :
प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली मुलाखत प्रचंड गाजली होती. आता त्यात अक्षय कुमारनं ficci 2025 च्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी अक्षयनं महाराष्ट्रात होत असलेल्या विकास कामांपासून ते मराठी चित्रपट सृष्टीच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न विचारले. याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी देखील दिलखुलास उत्तरं दिली.
मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमार फडणवीसांना तुम्हाला कोणत्या चित्रपटानं प्रभावित केलं असं विचारतो, त्यावेळी चित्रपट हे आपल्या भावना प्रभावित करतात असं उत्तर फडणवीस देतात. ते पुढे म्हणतात, 'मी एका राजकीय चित्रपटाबद्दल सांगतो. त्या चित्रपटानं मला प्रभावित तर केलंच मात्र त्या चित्रपटानं माझ्या समस्या खूप वाढवल्या. हा चित्रपट आहे नायक! नायक चित्रपटात अनिल कपूर हा एका दिवसाचा मुख्यमंत्री बनतो आणि एका दिवसात एवढी कामं करतो की मी कुठं जाईल तिथं लोकं नायक सारखं काम करा असं सांगतात.'
या मुलाखतीदरम्यान, अक्षय कुमार हा मुंबईतील झालेल्या विकास कामांबद्दल देखील देवेंद्र फडणवीस यांच्याशी गप्पा मारताना दिसला. त्यानं एक मजेशीर उदाहरण देत फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत होत असलेल्या विकासकमांचं एक प्रकारे कौतुकच केलं.
तो म्हणतो, 'मी जुहूला राहतो माझं शूटिंग कुलाब्याला असतं. आता जुहू पासून कुलाब्यापर्यंत जायला काही मिनिटं लागतात. मात्र पूर्वी तसं नव्हतं. मी जर जुहूच्या घरातून दाढी करून शूटिंगला निघालो तर मला कुलाब्यात शूटिंगच्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा दाढी करावी लागत होती. जुहू पासून कुलाब्यापर्यंत जाईपर्यंत दाढी वाढत होती. मात्र आता असं होत नाही. हे तुम्ही केलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांमुळेच झालं आहे.
फडणवीस यांनी अक्षयच्या मराठी चित्रपटांबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलता म्हणाले, मराठी चित्रपट आज मोठ्या ताकदीने उभा राहिला आहे, याचे मुख्य श्रेय मराठी थिएटर (नाट्यगृहांना) दिले जात आहे. अत्यंत सर्जनशील (Creative) आणि प्रभावी काम करत एक आदर्श ठेवला आहे. प्रेक्षक नाटकांना मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि याच सर्जनशीलतेची ताकद मराठी चित्रपटांमध्ये उतरली आहे.
एकेकाळी मराठी चित्रपटांना थिएटर मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागायचा. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. एकाच दिवशी दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होऊनही ते यशस्वी होत आहेत. असंही ते म्हणाले.
मराठी चित्रपटसृष्टीला अधिक चालना (Boost) देण्यासाठी सरकारने विशेष पाऊले उचलल्याचंही त्यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील फिल्म सिटीला आंतरराष्ट्रीय दर्जाची फिल्म सिटी करण्याचा मानस देखील बोलून दाखवला. ते म्हणाले, मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीचे आधुनिकीकरण करून तिला जागतिक दर्जाची बनवण्याचे काम सुरू आहे, जेणेकरून जागतिक स्तरावरच्या चित्रपट निर्मितीसाठी येथे उत्तम सुविधा उपलब्ध होतील.
अक्षय कुमारच्या मराठी चित्रपटांकडे जेन झीशी कनेक्ट करण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी प्रांजळपणे कबुली दिली. ते म्हणाले, Gen Z ला मराठी चित्रपटसृष्टीशी जोडण्याबाबत अजूनपर्यंत कोणतेही विशेष कामझालेले नाही. फडणवीस अक्षयला उद्येशून म्हणाले की तू आम्हाला आता एक चांगला मंत्र दिला आहेस. आम्ही Gen Z ला जोडण्यासाठी निश्चितच लवकरच काहीतरी प्रभावी काम करू, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
अक्षयनं क्राईम चित्रपटातून येतो की क्राईमवर आधारित चित्रपट निर्माण होत आहेत असा प्रश्न गृह खात्याचे मंत्री असलेल्या फडणवीसांना विचरला. त्यावेळी त्यांनी क्राईम हे चित्रपटांपेक्षाही पुढे आहे असे सांगत वाढत्या सायबर क्राईमचं किती मोठं आव्हान आहे हे सांगितलं.