

मुंबई : अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलेले असताना त्या ठिकाणी विलीनीकरणाबाबत चर्चा कोणी आणि कशासाठी केली, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या काही नेत्यांवर संताप व्यक्त केला आहे.
विलीनीकरण आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा घाईगडबडीत शपथविधी उरकल्याचा आरोप खासदार तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर केला जात आहे. या आरोपचे खंडन करताना तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत शरद पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. पण अजित पवार यांचे पार्थिव समोर असल्याचे पाहून या विषयावर वेगळे वातावरण तयार करण्यात आले. त्यामुळे विलीनीकरण चर्चा कोणी आणि कशासाठी केली, हे जनतेसमोर यायला पाहिजे. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घाईत झालेला नाही, असे ते म्हणाले.
दादांची इच्छा काय होती, काय गोष्टी घडल्या हे लोकांपर्यंत गेले पाहिजे. विलीनीकरण होईल किंवा नाही होणार, यावर भाष्य करण्याइतका मी मोठा नाही. फक्त राजकीय दृष्टिकोनातून आरोप-प्रत्यारोप किंवा चर्चा महाराष्ट्रात सुरू असल्यामुळे दुःख वाटते. अजितदादांच्या मनात काय होते, याबाबत कुणीही चर्चा करत नाही. ती चर्चा दुसरीकडे भरकटत चाललेली असून, त्याला मोठमोठ्या नेत्यांनी राजकीय स्वरूप दिले आहे. हे पाहून कुटुंबातील व्यक्ती म्हणून दुःख वाटत आहे.
रोहित पवार
एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच झाला होता. शपथविधी आणि विलीनीकरण हे दोन वेगळे मुद्दे आहेत. उलट सुनेत्रा पवार यांनी स्वतःला सावरत अजित पवार आणि पक्षाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी पाऊल उचलले, हे महत्त्वाचे असल्याची भावना तटकरे यांनी व्यक्त केली.