

मुंबई : राज्यातील मॉन्सूनपूर्व तयारीचा आढावा घेताना सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रभावीपणे पार पाडून आपत्तीचे सौम्यीकरण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. आपत्ती व्यवस्थापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आधारित एकात्मिक ‘कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’ विकसित करण्यासाठी कार्यवाही सुरू केली जावी, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व तयारी व आपत्ती व्यवस्थापनाबाबत आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. यावेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री मकरंद पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक वर्षी मॉन्सून नवीन आव्हाने घेऊन येतो. त्यामुळे मागील अनुभवांच्या आधारे अधिक सक्षम तयारी करणे आवश्यक आहे. केवळ कागदावरील नियोजन न ठेवता सर्व विभागांनी मानक कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. यंत्रणांचा तातडीचा प्रतिसाद, वेळेत इशारे आणि प्रभावित नागरिकांपर्यंत जलद मदत पोहोचणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढील 15 दिवसांत सर्व विभागांनी तयारीची पुन्हा पडताळणी करून त्रुटी दूर करण्याचे निर्देश दिले. या मॉन्सूनमध्ये सर्व यंत्रणांनी सतर्क राहून नागरिकांना जास्तीत जास्त दिलासा द्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. तर, एल निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी टँकर, चारा छावण्या व अन्य उपाययोजनांसाठी मदत व पुनर्वसन विभाग सज्ज असल्याचे मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले.
यावेळी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे संचालक डॉ. भालचंद्र चव्हाण यांनी सादरीकरण केले. विभागीय आयुक्त कोकण, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर यांनी यावेळी जिल्हास्तरावर करण्यात आलेल्या मान्सूनपूर्व तयारीचा आढावा सादर केला.
मुंबईत 43 मोठे पंपिंग स्टेशन कार्यरत
मुंबईत अतिवृष्टी आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांसाठी 43 मोठे पंपिंग स्टेशन कार्यरत करण्यात आले असून, स्मार्ट पंप मॉनिटरिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कोकण व घाट विभागातील रेल्वेमार्गांवर सुरक्षेच्या दृष्टीने गाड्यांचा वेग नियंत्रित ठेवण्यात येणार आहे. रुग्णालयांमध्ये 3 हजार खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आपत्ती व्यवस्थापन केंद्रे 24 तास कार्यरत राहणार आहेत.
मुंबई-गोवा तसेच इतर प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर पावसाळ्यात होणारे अपघात टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. पावसाळी पर्यटनस्थळी उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींच्या पार्श्वभूमीवरही सुरक्षा उपाय वाढविण्यात आले आहेत. नंदुरबार आणि मेळघाटातील आदिवासी व दुर्गम भागांमध्ये पावसाळ्यात आरोग्य सुविधा खंडित होऊ नयेत यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.