

Paresh Rawal National Film Awards Controversy: नॅशनल फिल्म अवॉर्डच्या ७२ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा देशाची राजधानी दिल्लीतून हलवून गुजरातच्या केवडियामध्ये आयोजित केला जाणार आहे. यावरून अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले असून हा पुरस्कार वितरण सोहळा गुजरातला हलवण्यावरून टीका केली आहे. हलवायचाच होता तर तो महाराष्ट्रात का हलवला नाही असं देखील मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबाबत प्रचंड आग्रही आणि आक्रमक भूमिका मांडत आहेत. त्यावर आता अभिनेता परेश रावल जाम भडकला आहे.
अभिनेता परेश रावलने ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे यजमानपद गुजरातकडे दिले जाण्याची पाठराखण केली आहे. गुजरात भारताचा एक अभिन्न अंग असून तिथं कोणतेही मोठे राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करण्यात काही गैर नाही असं मत त्यानं व्यक्त केलं आहे.
गुजरातमध्ये ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला आहेत त्यावर आता अभिनेता परेश रावल यांची प्रतिक्रिया आली आहे. ते म्हणतात की, 'गुजरात काय बांगलादेश किंवा पाकिस्तानात आहे का? हा देखील आपल्याच देशाचा भाग आहे. त्यामुळं हा सोहळा गुजरातमध्ये का होऊ शकत नाही? गुजरातमध्ये देखील सोहळे झाले पाहिजेत. माझे मत आहे की असे सोहळे प्रत्येक राज्यात झाले पाहिजे. यात काही गैर नाहीये. २६ जानेवारीची परेड तर दिल्लीतच होते. मी म्हणतो अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक राज्यात झाले पाहिजेत.'
परेश रावल पुढे म्हणाला, 'राजकीय नेत्यांचे कामच आहे की या सारख्या गोष्टींवर प्रश्न उपस्थित करणे. मात्र माझा प्रश्न हा आहे की काय गुजरात आपल्या देशाचा भाग नाहीये का?
चित्रपट निर्माते राहुल ढोलकिया आणि महराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी यावरून टीका केली होती. राज ठाकरे यांनी, 'नॅशनल फिल्म अवॉर्ड दिल्लीतून गुजरातमध्ये घेऊन जाण्याचं नेमकं कारण काय? जर पुरस्कार सोहळ्याचे लोकेशन बदलायचेच होते तर मग मुंबईत हा सोहळा का आयोजित केला नाही?' असा प्रश्न विचारला होता.
तर चित्रपट निर्माते राहुल ढोलकिया यांनी देखील राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हा दिल्लीतच आयोजित केला जावा. तो गुजरातमध्ये का शिफ्ट केला जात आहे. ज्या राज्याने चित्रपट क्षेत्रासाठी सर्वात जास्त योगदान दिलं आहे त्या राज्याला ही संधी का दिली जात नाही?
यंदाचा ७२ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा हा दिल्ली ऐवजी गुजरात केवडिया मध्ये आयोजित केला जाणार आहे. हा पुरस्कार सोहळा २२ सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. एका मोठ्या धोरणात्मक निर्णयानुसार मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट सोहळा हा राजधानीच्या बाहेर नेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितलं. आता हे सोहळे राजधानीच्या बाहेर देशाच्या विविध भागात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.