Lok Sabha Election Eknath Shinde : काँग्रेसने शहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का ?: एकनाथ शिंदे | पुढारी

Lok Sabha Election Eknath Shinde : काँग्रेसने शहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का ?: एकनाथ शिंदे

ठाणे : पुढारी वृत्तसेवा: राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी २६/११ हल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का ?  अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकतो, तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. जेव्हा भारत मॅच हरतो. तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. त्यामुळे काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ, असा जोरदार निशाणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवरही साधला.

ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज (दि.६) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.

मुख्यमंत्री म्हणाले की, विजय वड्डेटीवारांनी २६/११ हल्ल्यातील शहीद पोलिस आणि मृत्यूमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणारे आहे. भारत जोडो नाही, तर भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वड्डेटीवार वेडे झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली. आरएसएस ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे, असे त्यांनी सांगितले. वकिल उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकले, असे मुख्यमंत्री म्हणाले. कॉंग्रेसचे धोरण पाकिस्तान धार्जिणे आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणे हे दुर्देवी आहे.  मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसने असेच आरोप केले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही. तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना  लगावला.

नकली हिंदुत्व, मी हिंदू आहे, मी मर्द आहे, असे बोलून कोणी हिंदू होत नाही. आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते. तर यांना चांगलेच धुतले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन भारत मजबूर नाही तर मजबूत देश आहे, असे दाखवून दिले. घुस के मारेंगे, हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटले आहेत. गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर कॉंग्रेसने आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

‘काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.  काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना देखील काश्मिरबाबत बोटचेपी धोरण ठेवले. आपल्या जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तान नेत असताना काँग्रेस सरकार मूग गिळून गप्प बसले होते, असे मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button