Maharashtra Cabinet Decision | ब्रेकिंग! अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’, राज्य सरकारचा निर्णय | पुढारी

Maharashtra Cabinet Decision | ब्रेकिंग! अहमदनगरचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’, राज्य सरकारचा निर्णय

पुढारी ऑनलाईन : अहमदनगर शहराचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्यास आज बुधवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. (Maharashtra Cabinet Decision)

अहमदनगर शहराचे नामकरण अहिल्यानगर

अहमदनगर शहराचे तसेच जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अहमदनगर शहराचे नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक व संघटनांनी केली होती. या संदर्भात विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडून माहिती मागविण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठरावदेखील राज्य शासनास प्राप्त झाला होता. या अनुषंगाने गृह मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतरणाची कार्यवाही महसूल व नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे.

मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यासही सरकारने मान्यता दिली आहे. तसेच पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आली आहे. आता पोलीस पाटलांना महिन्याला १५ हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच आशा स्वयंसेविकांच्या मानधनात भरीव पाच हजार रुपयांची वाढ करण्याचेही सरकारने ठरवले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय Maharashtra Cabinet Decision

  • मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर.
  • पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये.
  • अहमदनगर शहराचे नामकरण ‘अहिल्यानगर’ करण्यास मान्यता.
  • केंद्राच्या सहाय्याने लहान शहरांमध्ये अग्निशमन सेवा बळकट करणार. राज्याच्या १५३ कोटी हिश्श्याला मान्यता.
  • श्रीनगरजवळ महाराष्ट्र राज्य अतिथीगृह बांधणार. अडीच एकर भूखंड घेणार.
  • कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामधील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य. ३२०० कोटींचा प्रकल्प.
  • भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत ५० वर्ष मुदतीचे बिनव्याजी कर्ज.
  • राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ.
  • महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारणार. नफ्यात आणणार.
  • मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस मान्यता. ३५ गावांना लाभ होणार.
  • मूर्तिजापूर येथील वडगाव साठवण तलावाची दुरुस्ती करणार. १२५ हेक्टर जमीन सिंचित करणार.
  • शुभमंगल सामूहिक विवाह योजनेत अनुदानामध्ये वाढ. आता संस्थांना २५ हजार रुपये अनुदान.
  • मानसेवी वैद्यकीय अध्यापकांचे मानधन वाढविले.
  • आयटीआय मधील कंत्राटी शिल्पनिदेशकांना नियमित शासन सेवेत घेणार.
  • कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्यासाठी ९०२० कोटी एआयआयबी बँकेकडून घेणार.
  • शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करणार.
  • ११ हजार ५८५ कोटींच्या प्रकल्पास मान्यता.
  • पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे एकत्रीकरण करून पुनर्रचना. प्रशासनात सुधारणा होणार.
  • पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यता
  • म्हसळा तालुक्यात शासकीय युनानी महाविद्यालय व रुग्णालय सुरू करणार. युनानी उपचार प्रणालीला प्रोत्साहन.
  • आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ.
  • मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलणार.
  • मुंबई उपनगरातील वाहतुकीचा मार्ग आणखी मोकळा होणार. उत्तन ते विरार सागरी सेतू मार्गास मान्यता.
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत २३ हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार. या वर्षात दहा हजार किमी रस्ते.
  • भोगवटामूल्याची रक्कम कमी करणार.
  • महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेच्या अकादमीसाठी कळवा येथील शासकीय जमीन.
  • जालना खामगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग. २४५३ कोटी राज्याच्या हिश्यास मान्यता.
  • दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना.

हे ही वाचा :

 

Back to top button