ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आणखी ६२ वसतिगृहे | पुढारी

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आणखी ६२ वसतिगृहे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेतून ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सामाजिक न्याय विभागाच्या स्व.गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत मंजूर 82 पैकी केवळ 20 वसतिगृहे सुरू आहेत. उर्वरित 62 वसतिगृहांनाही आता मंजुरी देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत राज्यात ऊसतोड कामगारांची संख्या अधिक असलेल्या 41 तालुक्यांची निवड करून 100 क्षमतेचे मुला-मुलींसाठी स्वतंत्र अशी एकूण 82 वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय धनंजय मुंडे यांनी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असताना घेतला होता. बीड, अहमदनगर व जालना जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 20 वसतिगृहे भाड्याच्या जागेत सुरू करण्यात आली होती. यापैकी आतापर्यंत 5 वसतिगृहांना स्वतःच्या जागेत इमारत बांधकामासाठी प्रत्येकी 10 कोटी रुपये निधी देखील सरकारने उपलब्ध करून दिला आहे. आता या वसतिगृह योजनेतील उर्वरित 62 वसतिगृहे सुरू करण्याची मंत्री मुंडे यांची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आहे. त्यानुसार आता आणखी 31 तालुक्यांत 62 वसतिगृहे उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ही वसतिगृहे सुरुवातीस भाड्याच्या जागेत चालवली जाणार असून आगामी शैक्षणिक वर्षांपासून खुली करण्यात येतील. टप्प्याटप्प्याने वसतिगृहे स्वतःच्या जागेत इमारती उभारून चालवली जातील.

या ठिकाणी सुरू होणार प्रत्येकी दोन वसतिगृहे :

बीड जिल्हा ः वडवणी, धारूर, शिरूर कासार, आष्टी, अंबाजोगाई
अहमदनगर ः शेवगाव
जालना ः परतूर, बदनापूर, जालना, मंठा
नांदेड ः कंधार, मुखेड, लोहा
परभणी ः गंगाखेड, पालम, सोनपेठ
धाराशिव ः कळंब, भूम, परांडा
लातूर ः रेणापूर, जळकोट
छत्रपती संभाजीनगर ः पैठण, सोयगाव, सिल्लोड
नाशिक ः निफाड, नांदगाव, येवला, सिन्नर
जळगाव ः एरंडोल, यावल, चाळीसगाव

Back to top button