

पुढारी ऑनलाईन डेस्क: आपला प्लांट महाराष्ट्रात उभा करण्यासाठी 'टेस्ला' या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रातील कंपनी चाचपणी करत होती. मात्र कंपनीने अंतिम टप्प्यात आपला तंबू गुजरातमध्येच रोवण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृत्त महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. (Rohit Pawar On Government)
आमदार रोहित पवार यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारच्या अक्षम्य नाकर्तेपणावर शिक्कामोर्तब तर होतंयच. पण येणारा प्रत्येक नवीन उद्योग आणि महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात होणारी गुंतवणूकही फक्त आणि फक्त गुजरातमध्येच नेली जात आहे. यावरून केंद्र सरकार हे केवळ गुजरातसाठीच काम करत असल्याचंही स्पष्ट होत आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे. (Rohit Pawar On Government)
महाराष्ट्रातील युवांना सध्याच्या दोन्ही सरकारकडून आता कोणतीही अपेक्षा राहिलेली नाही. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्राचा विकास आणि अपेक्षित गुंतवणूक आणून नवीन रोजगार निर्मिती करायची असेल तर या दोन्ही सरकारांना सत्तेवरून खाली खेचण्याशिवाय आता कुठलाही पर्याय नाही. (Rohit Pawar On Government)