पुढारी ऑनलाईन डेस्क : 'दलित असताना येथे का आला' अशी विचारणा करत मंदिरातून शोभायात्रा पाहून परत जात असलेल्या एका तरुणाला सात ते आठ जणांच्या समूहाने बेदम मारहाण केली. यात दलित युवकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२६) रोजी घडली. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोस्ट करत सरकारला धारेवर धरले आहे. (Maharashtra Politics)
विवेक विश्वनाथ खोब्रागडे व फैजान खान हे दोघे रामटेकमधील प्रसिद्ध गडमंदिरात शोभायात्रा पहायला गेले होते. त्या दरम्यान या दोघांना मारहाण केली. यात विवेक खोब्रागडे याचा मृत्यू झाला तर फैजान खान जखमी झाला आहे. यावरुन सर्व स्तरातून संमिश्र भावना व्यक्त केल्या जावू लागल्या आहेत. यावरुन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,
"नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. 'तुम्ही महार आणि मुस्लीम असूनही येथे कशाला आले?' अस म्हणून केवळ गडमंदिर शोभायात्रेत सामिल झाला म्हणून मारहाण केल्याचे पीडिताच्या वडिलांनी पोलीस जबाबात सांगितले आहे. ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी आहे. छ. शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. थोर संतांची, समाजसुधारकांची शिकवण महाराष्ट्राला मिळाली आहे. तरीही अशा घटना वारंवार घडत आहेत हे दुर्दैवी आहे. यापूर्वी बीड येथील पारधी समाजाच्या महिलेला विवस्त्र करून मारहाण केली गेली. शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली होती. अशा एकामागून एक घटना घडत असताना सरकार मात्र गप्प आहे. ह्या घडना घडू नयेत म्हणून सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. समाजकंटकांना कायमची अद्दल घडविण्याचा दम सरकारमध्ये नाही. म्हणून अशा घटनेत वाढ होताना दिसत आहे. सत्तेत असलेल्यांनी जी जातीय विषाची पेरणी केली त्यातून हे सगळ उगवल आहे."
हेही वाचा