Supriya Sule vs Chitra Wagh : आरक्षण शिंदे सरकारच देणार, चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर | पुढारी

Supriya Sule vs Chitra Wagh : आरक्षण शिंदे सरकारच देणार, चित्रा वाघ यांचे सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेले काही दिवस राज्यात मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे. मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणासाठी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतरही सरकारने मराठा आरक्षणावर कोणतीही ठोस निर्णय घेतला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले. आजचा (दि. ३१) उपोषणाचा सातवा दिवस आहे. सत्ताधारी-विरोधकांमध्ये मराठा आरक्षणावरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. या दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी,”देवेंद्र फडणवीसांना मराठा आंदोलन झेपत नाही, त्यांचा राजीनामा घ्यावा”, असं वक्तव्य केले होते. याला भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.(Supriya Sule vs Chitra Wagh)

Supriya Sule vs Chitra Wagh : कशाला घसा कोरडा करताय?

चित्रा वाघ यांनी आपल्या ‘X’ अकाउंटवर सुप्रिया सुळे यांना टॅग करत पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “ज्यांनी मराठा आरक्षण दिले, त्यांचा राजीनामा कोण मागतंय. तर जे 1980 पासून मराठा आरक्षणाचा लढा सुरू झाल्यापासून, मराठा आरक्षणासाठी काहीच करू शकले नाही. काळजी करू नका मोठ्ठ्याताई सुप्रिया सुळे, आरक्षण हेच सरकार देणार! जे तुमच्या मनात नाही. जे तुम्ही दिले नाही, त्यावर कशाला घसा कोरडा करताय ?”

काय म्हणाले होत्या सुप्रिया सुळे?

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत. त्यांची घरे जाळली जात आहेत. आरक्षणाच्या मागणीचे आंदोलन दिवसेंदिवस दिवस तीव्र होत आहे.‌ या काळात राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात ठाण मांडून बसणे आवश्यक आहे. परंतु हे महोदय छत्तीसगडमध्ये निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. यापुर्वी देखील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला तेव्हा हे महाशय राज्यात उपलब्ध नव्हते. अगदी नागपूर पाण्यात बुडाले तेव्हा देखील ते मुंबईत हायकमांडची सेवा करण्यात बिझी होते. त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा राज्यातील जनतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा उदासीन आणि आकसपूर्ण आहे हे यानिमित्ताने उघड झाले आहे. अडचणीच्या काळात महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या या निष्क्रिय गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने त्यांचा राजीनामा घेऊन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी.

हेही वाचा 

Back to top button